श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते.

१८५१
नदीकाठी अगदी एकांत असतो,
तेथे मन नामात लवकर रंगून जाते.
मुंज झाल्यानंतर श्रींची बुद्धी अधिकच अंतर्मुख होऊ लागली. ध्रुव, प्रल्हाद, द्रौपदी, गजेन्द्र इत्यादि भक्तांच्या कथा त्यांनी पंतांच्याकडून वारंवार ऐकल्या होत्या. त्यावर आता जोराने मनन होऊ लागले. एके दिवशी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पंत जागे झाले आणि शेजारच्या अंथरूणावर पाहतात तो त्यावर श्री नाहीत. लगेच पंतांची मंडळींना उठवले आणि दिवे व मशाली घेऊन श्री कुठे आहेत याचा शोध चालविला. आई तर फारच घाबरली. सगळ्या गावात शोध केला पण श्रींचा पत्ता लागेना. मग निराश झालेली मंडळी शेवटचा प्रयत्न म्हणून नदीकडे स्मशानाच्या बाजूला गेली, तर तेथे एका लहानशा गुहेमध्ये ही स्वारी आसन घालून डोळे झाकून बसली होती. मंडळींची गडबड ऐकून श्रींनी डोळे उघडले आणि ते वडिलांच्या बरोबर घरी परत आले. पंतांनी विचारले, "बाळ, कुठे गेला होतास ?" श्री म्हणाले "नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते" आजोबा म्हणाले, "तुला साप, विंचू, भूत-पिशाचांची भीती वाटली नाही का ?" त्यावर श्रींनी सांगितले, "छे ! त्यांना काय भ्यायचे ?" पुढे काही दिवसांनंतर श्री पुन्हा असेच नदीकाठी जाऊन ध्यानस्थ बसले, पण यावेळी घरच्या मंडळींनी फारशी गडबड केली नाही. आणि पहाटेच्या सुमारास ते घरी परत आले. व्यवहाररिक द्दष्टीन त्याला लिहायला व वाचायला चार अक्षरे यावीत म्हणून लौकिक विद्या संपादन करण्याकरिता आजोबांनी आपल्या नातवास गावच्या पंतोजींच्या शाळेत घातले, परंतु मुलाच्या अलौकिक बुद्धिच्या मानने पंतोजी कमी पडले. शाळेत श्री पंतोजींना येत असलेली विद्या चटकन शिकले. पुढे श्रींना शाळेत करमेना त्यांनी शाळेतील आपल्या मित्रांबरोबर शाळेच्या बाहेर खेळणे सुरू केले. सर्वांनी ओढयावर जाऊन विटीदांडू खेळणे चालू केले. विटी-दांडू, खेळामध्ये श्री इतके प्रवीण होते की डाव आपल्या हाती आल्यावर दुस‍र्या बाजूची पोरे रडकुंडीला येईर्पंत चोपीत बसायचे, मग ते आपणहून चुकायचे व बाद व्हायचे. हीच त‍र्हा इतर बाबतीत होत असे. मोठमोठया झाडांवर हां हां म्हणता ते चढून जात. पोहण्यामध्ये आणि कुस्ती खेळण्यामध्ये तर त्यांचा नेहमी पहिला नंबर ठरलेला. तसेच घोडयावर बसणे, उडया मारणे, दंड काढणे, गोटया खेळणे इ. लहान मुलांच्या सर्व खेळांमध्ये त्यांती बरोबरी करेल असा त्यावेळी कोणी नव्हता.