गीत दासायन

गीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.


प्रसंग १

समर्थ रामदासस्वामींचे नाव माहीत नसणारा भारतीय क्वचितच सापडेल. धर्मकारण आणि राजकारण यांची अचूक सांगड घालणारा हा महापुरुष जांब नावाच्या खेड्यात ठोसर कुलात जन्माला आला. वडिलांचे नाव सूर्याजीपंत आणि आईचे नाव रेणुका असे होते. सूर्याजीपंतांच्या पूर्वी जवळ जवळ बावीस पिढ्या श्रीरामाची उपासना यांच्या घराण्यात चालू होती. सूर्याजीपंत्र सूर्याचेही उपासक होते. त्यांना प्रभू रामचंद्राच्या कृपेने दोन पुत्र झाले. त्यातला लहान पुत्र हाच नारायण ऊर्फ समर्थ रामदासस्वामी होत. आपल्या अतुल रामभक्तीने आणि असामान्य सदाचरणाने महाराष्ट्रात सर्वत्र प्रभू रामचंद्राची उपासना वाढवून सर्वांना नामस्मरणाचा सोपा मंत्र ज्यांनी दिला ते समर्थ रामदास स्वामी नेहमी म्हणत असत-

"जय जय रघुवीर समर्थ"

महाराष्ट्राच्या गाभार्‍यातुन दुमदुमले जे सार्थ ।

जय जय रघुवीर समर्थ ॥१॥

जांब गावचा तो कुलकर्णी

ठोसर नामे करि कुलकरणी

सूर्याजी सूर्यासम होता

नाम जयाचे सार्थ ॥१॥

रेणुकासती त्याची भार्या

नित सेवारत पतिच्या कार्या

सुखि संस्कारी एक उणेपण

संतानाविण व्यर्थ ॥२॥

बावीस पिढ्या ठोसर कुळिच्या

अनन्य चरणी प्रभुरामाच्या

प्रसन्न झाले श्रीरघुनंदन

बघुनि भाव निःस्वार्थ ॥३॥

सूर्याजीला दर्शन देउनि

वर दिधला त्या श्रीरामानी

"दोन सद्गुणी सुपुत्र होतिल

करतिल जे वेदार्थ."

ज्येष्ठ पुत्र जो म्हणति श्रेष्ठ त्या ।

बुद्धिमान अन शांतच जात्या ।

मायपित्या आधार जाहला

संसारी सिद्धार्थ ॥५॥

रामनवमिचा शुभ दिन आला ।

प्रभुजन्माची मंगल वेळा

साधुनिया अवतार जाहला

सद्गुरुराज समर्थ ॥६॥

आनंदी आनंद जाहला

साक्षात वायूसुत अवतरला

जनसेवेची अपूर्ण वांच्छा

पुरवुनि होइ कृतार्थ ॥७॥