श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २६ वा

नाधुना तेऽखिलाधार देवकार्यावशेषितम् ।

कुलं च विप्रशापेन नष्टप्रायमभूदिदम् ॥२६॥

आतां पुढें येथ कांहीं । देवकार्य उरलें नाहीं ।

यादवकुळ म्हणसी तेंही । नष्टप्राय पाहीं उरलेंसे ॥५५॥

उठवणी आलें हतिरूं । कां पांख उपडिल्या पांखरूं ।

तैसा यादवांचा दळभारू । भूमिये भारु उरला असे ॥५६॥

निवणाचा फुटका डेरा । कां क्षयो लागल्या राजकुमरा ।

वणवा आहाळल्या अजगरा । यादववीरां ते दशा ॥५७॥

दारुण ब्राह्मणाचा शाप । नाशला वीर्यशौर्यप्रताप ।

गळाला वाढिवेचा दर्प । केवळ प्रेतरूप दिसताती ॥५८॥