श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १७ वा

ग्राम्यगीतं न शृणुयाद् यतिर्वनचरः क्वचित् ।

शिक्षेत हरिणाद् बधान् मृगयोर्गीतमोहितात् ॥१७॥

ग्राम्यजनवार्ता । कां ग्राम्य स्त्रियांच्या गीता ।

ऐके जो कां तत्त्वतां । बंधन सर्वथा तो पावे ॥५८॥

अखंड पाहतां दीपाकडे । घंटानादें झालें वेंडें ।

मृग पाहों विसरला पुढें । फांसीं पडे सर्वथा ॥५९॥

ग्राम्य योषितांचे गीत । ऐकतां कोणाचें भुलेना चित्त ।

मृगाच्या ऐसा मोहित । होय निश्चित निजस्वार्था ॥१६०॥

जो बोलिजे तापसांचा मुकुटी । ज्यासी स्त्रियांसी नाहीं भेटगोष्टी ।

तो ऋष्यश्रृंग उठाउठी । स्त्रीगीतासाठीं भुलला ॥६१॥