श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४१ वा

आत्मैव ह्यात्मनो गोप्ता निर्विद्येत यदाखिलात् ।

अप्रमत्त इदं पश्येद्ग्रस्तं कालाहिना जगत् ॥४१॥

ऐसें कळलें जी तत्त्वतां । येथ आपणचि आपणिया त्राता ।

सर्व पदार्थीं सर्वथा । निर्वेदता दृढ जाहल्या ॥८७॥

दृढ वैराग्यता ते ऐसी । विषयो टेंकल्या अंगासी ।

चेतना नव्हे इंद्रियांसी । निद्रितापासीं जेवीं रंभा ॥८८॥

अथवा वमिलिया अन्ना । जेवीं वांछीना रसना ।

तेवीं विषय देखोनि मना । न धरी वासना आसक्ती ॥८९॥

तें वैराग्य कैसेनि जोडे । तरी सावधान पाहतां रोकडें ।

जग काळें गिळिलें चहूंकडे । वेगळें पडे तें नाहीं ॥२९०॥

पिता पितासह काळें नेले । पुत्रपौत्रां काळें गिळिलें ।

वैराग्य नुपजे येणें बोलें । तरी नागवले नरदेहा ॥९१॥

मृत्युलोक याचें नांव । अनित्य स्वर्गाची काइसी हांव ।

वैराग्येंवीण निर्दैव । झाले सर्व सर्वथा ॥९२॥