श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५ वा

क्वचित् कुमारी त्वात्मानं वृणानान् गृहमागतान् ।

स्वयं तानर्हयामास क्वापि यातेषु बन्धुषु ॥५॥

कोणी एके कुमारीसी । घरीं राखण ठेवूनि तिसी ।

पिता माता स्वगोत्रेसीं । गेली यात्रेसी कुळदेवा ॥८७॥

ते कुमारीचें विवाहलग्न । पूर्वीं नेमिलें होतें जाण ।

त्या निश्चयालागीं ब्राह्मण । घरा संपन्न पैं आले ॥८८॥

पुसती घरीं आहे कोण । लाजे नोवरी धरी मौन ।

त्यांसी न देतां दर्शन । पूजाविधान ते मांडी ॥८९॥

वातायनद्वारा आसनें । दिधलीं समस्तांकारणें ।

गंधाक्षता सुमनें पानें । दिधले मौनें उपचार ॥९०॥

देखोनि पूजेचें विधान । जाणों सरले ते ब्राह्मण ।

घरीं नोवरीचि आहे जाण । हें चतुरलक्षण तियेचें ॥९१॥

त्यांच्या पाहुणेराची चिंता । उशिरां येईल माझी माता ।

ते काळीं साळीं सडितां । विलंबु सर्वथा होईल ॥९२॥