श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २७ वा

विषयान् ध्यायतश्चित्तं विषयेषु विषज्जते ।

मामनुस्मरतश्चित्तं मय्येव प्रविलीयते ॥ २७ ॥

जो करी विषयांचें ध्यान । तो होय विषयीं निमग्न ।

जो करी सदा माझें चिंतन । तो चैतन्यघन मीचि होय ॥४९॥

स्त्री गेली असतां माहेरीं । ध्यातांचि प्रकटे जिव्हारीं ।

हावभावकटाक्षेंवरी । सकाम करी पुरुषातें ॥३५०॥

नसते स्त्रियेचें ध्यान करितां । प्रकट दिसे यथार्थता ।

मी स्वतः सिद्ध हृदयीं असतां । सहजें मद्‌रूपता चिंतितां मज ॥५१॥

आवडीं माझें जें चिंतन । चित्त चिंता चिंतितेपण ।

विरोनि होय चैतन्यघन । मद्‌रूपपण या नांव ॥५२॥

माझे प्राप्तीलागीं जाण । हेंचि गा मुख्य लक्षण ।

माझें ध्यान माझें भजन । मद्‌रूपपण तेणें होय ॥५३॥

मजवेगळें जें जें ध्यान । तेंचि जीवासी दृढबंधन ।

यालागीं सांडूनि विषयांचें ध्यान । माझें चिंतन करावें ॥५४॥