श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २५ वा

यदाऽऽत्मन्यर्पितं चित्तं शान्तं सत्त्वोपबृंहितम् ।

धर्मं ज्ञान सवैराग्यमैश्वर्यं चभिपद्यते ॥२५॥

आपुलें जें कां अंतःकरण । तें करितां गा मदर्पण ।

माझी निजभक्ति उल्हासे जाण । जिचें निरूपण म्यां केलें ॥२५॥

मद्‌रूपीं अर्पावया मन । सुगम वर्म सांगेन जाण ।

माझें करितां नामस्मरण । पापनिर्दळण तेणें होय ॥२६॥

सकाम स्मरतां नाम । नाम पुरवी सकळ काम ।

निर्विकल्पें स्मरतां नाम । करी भस्म पापाचें ॥२७॥

होतां पापाचें क्षालण । रज तम जिणोनि जाण ।

सहजें वाढे सत्त्वगुण । धर्मपरायण धार्मिक ॥२८॥

स्वधर्मनिष्ठ सत्त्वगुणें । अढळ पडे वैराग्याचें ठाणें ।

वैराग्यें विषय निर्दळणें । निजज्ञान तेणें प्रकाशे ॥२९॥

वाढल्या सविवेक ज्ञान । लागे स्वरूपाचें अनुसंधान ।

चढे शांतीचें समाधान । तैं मदर्पण मन होये ॥३३०॥

मन जाहल्या मदर्पण । निजभक्ति उल्हासे जाण ।

जिचें गतश्लोकीं निरूपण । म्यां संपूर्ण सांगितलें ॥३१॥

निजभक्ति पावल्या संपूर्ण । भक्तें न मागतां जाण ।

अष्ट महासिद्धी आपण । त्याचें आंगण वोळंगती ॥३२॥

जो सिद्धींकडे कदा न पाहे । त्यासी अवशेष कोण अर्थ राहे ।

माझी संपूर्ण पदवी लाहे । मदैक्य होये मद्‍भक्तां ॥३३॥

ऐशी न जोडतां माझी भक्ती । न लाभतां आत्मस्थिती ।

वर्तणें जैं विषयासक्तीं । तैं अनर्थप्राप्ती अनिवार ॥३४॥