श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १६ वा

अहोरात्रैश्छिद्यमानं, बुद्धावायुर्भयवपेथुः ।

मुक्तसङगः परं बुद्धवां, निरीह उपशाम्यति ॥१६॥

अहोरात्र आयुष्यभंग । कळिकाळाचा सवेग वेग ।

हां जाण नीच नवा रोग । अंगीं साङग लागला ॥५९॥

काळें काळ वयसा खातु । हा देखोनि आयुष्याचा घातु ।

जाणोनि नरदेहाचा पातु । होय अनासक्तु देहगेहां ॥१६०॥

जाणोनि देहाचें क्षणिकपण । त्यागावया देहाभिमान ।

साधावया भक्तिज्ञान । अतिसावधान जो होय ॥६१॥

न सांडितां देहाभिमान । अंगीं आदळे मरण ।

तेणें भयें कंपायमान । वैराग्य पूर्ण स्वयें धरी ॥६२॥

वैराग्ययुक्त करितां भक्ती । होय देहाभिमानाची निवृत्ती ।

तैं घर रिघे ज्ञानसंपत्ती । पायां लागती मुक्ती चारी ॥६३॥

ऐशी झालिया निजात्मप्राप्ती । सहजेंचि राहे प्रवृत्ती ।

निवृत्तीसी होय निवृत्ती । संसाराची शांती स्वयें होय ॥६४॥

ऐसे नरदेहा येऊनि देख । पुरुष पावले ’परमसुख’ ।

हें न साधिती जे मूर्ख । त्यांसी देवो देख निंदित ॥६५॥