श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५ वा

केनचिद्भिक्षुणा गीतं परिभूतेन दुर्जनैः ।

स्मरता घृतियुक्तेन विपाकं निजकर्मणाम् ॥५॥

उद्धवा कोणी एक संन्यासी । दुर्जनीं उपद्रवितां त्यासी ।

म्हणे क्षयो होय दुष्टकर्मासी । येणें संतोषें मानसीं क्षमावंत ॥७१॥

आपुले अंगींचे मळ । पुढिलीं क्षाळितां सकळ ।

जो क्रोधेंसीं करी तळमळ । तो मूर्ख केवळ आत्मघाती ॥७२॥

लोक म्हणती ज्यासी दुर्जन । संन्यासी म्हणे ते माझे स्वजन ।

माझे दोषांचें निर्दळण । यांचेनि धर्में जाण होतसे ॥७३॥

संमुख कोणी निंदा करिती । तेणें अत्यंत सुखावे चित्तीं ।

म्हणे मज तुष्टला श्रीपती । पापाची निष्कृती सहजें होय ॥७४॥

ऐसेनि विवेकें तत्त्वतां । शांतीसी ढळों नेदी सर्वथा ।

चढोनि निजधैर्याचे माथां । गायिली गाथा ते ऐक ॥७५॥

उद्धवासी म्हणे श्रीकृष्णनाथा । ये अर्थी होईं सावचित ।

अतिलोभी तो अतिविरक्त । झाला तो वृत्तांत सांगेन ॥७६॥;