श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४० वा

इत्येके विहसन्त्येनमेके दुर्वातयन्ति च ।

तं बबन्धुर्निरुरुधुर्यथा क्रीडनकं द्विजम् ॥४०॥

कदर्या बाणली पूर्ण शांती । ऐसे एक उपहासिती ।

एक नाकीं चुना लाविती । एक मुख माखिती काजळें ॥५७॥

एक अतिशठ साचोकारे । पुढां ठाकोनि पाठिमोरे ।

शर्धा करिती अधोद्वारें । नाकीं तोंडीं भरे दुर्गंध ॥५८॥

तरी त्याचिया निजस्थिती । अणुमात्र क्षोभ न ये चित्तीं ।

तोचि संन्यासी त्रिजगतीं । ज्याची ढळेना शांती क्षोभविल्याही ॥५९॥

एवं क्षोभेना त्याचें मन । देखोन खवळले दुर्जन ।

त्यासी गळां शृंखला निरोधन । आणिला बांधून चौबारा ॥५६०॥

यासी वोळखा रे कोणी तुम्ही । हा धनलोभी जो अकर्मी ।

तो आजी सांपडविला आम्हीं । अतिअधर्मी दांभिक ॥६१॥

जेवीं गारुडी बांधी माकडा । तेवीं संन्यासी बांधिला गाढा ।

मिळोनियां चहूंकडा । मागांपुढां वोढिती ॥६२॥

एक ओढिती पूर्वेसी । एक ओढिती पश्चिमेसी ।

संन्यासी हांसे निजमानसीं । सुख सर्वांसी होये येणें ॥६३॥;

देह प्रारब्ध भोगी जाण । याचा मजसी संबंध कोण ।

येणें विवेकें क्षमापूर्ण । कोणाचें मन दुखवीना ॥६४॥

जेथ स्वगोत्र सोइरे स्वजन । जिंहीं दीधला अतिसन्मान ।

त्यांदेखतां अपमान । अनुद्विग्न जो साहे ॥६५॥

त्यापाशीं शांति संपूर्ण । उद्धवा निश्चयेंसीं जाण ।

ज्याचें लोकेषणे लाजे मन । अशांति जाण ते ठायीं ॥६६॥

ऐसा क्षोभवितां पहा हो । क्षोभा न चढे त्याचा भावो ।

त्या संन्याशाचा अभिप्रावो । स्वयें देवाधिदेवो सांगत ॥६७॥