श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४३ वा

दत्वाऽऽचमनमुच्छेषं; विष्वक्‍सेनाय कल्पयेत् ।

मुखवासं सुरभिमत्ताम्बूलाद्यमथार्हयेत् ॥४३॥

एवं विसर्जिलिया ध्यान । झालें देवाचें भोजन ।

ऐसें भावूनि आपण । शुद्धाचमन अर्पावें ॥२६॥

अग्नीमाजील मूर्तिध्यान । प्रतिमा पूजिली जे आपण ।

दोहीं ठायीं शुद्धाचमन । यथोक्त जाण करावें ॥२७॥

देवाचिया भुक्तशेषासी । भाग द्यावा विष्वक्‍सेनासी ।

मग काढूनि उच्छिष्टासी । द्यावें देवासी करोद्वर्तन ॥२८॥

कापुरें घोळिवा सुपारी फोडी । सुवर्णवर्णा पानांची विडी ।

काथ सुवासिला परवडीं । अभिनव गोडी तांबूला ॥२९॥

एळा लवंगा कंकोळ । अल्प अर्पिलें जातीफळ ।

सुरंग रंगलें तांबूल । दिसे मुखकमळ साजिरें ॥३३०॥

चोवा कस्तूरी बुका सधर । अर्पूनि पुष्पांजळीसंभार ।

जेणें शीघ्र संतोषे श्रीधर । तें प्रेम साचार हरि सांगे ॥३१॥