गणेशोत्सव

गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो.


प्रतिष्ठापना पूजा

श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन,स्नान,अभिषेक,वस्त्र ,चंदन,फुले,पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यत: उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत. त्यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.उदा. शमी ही थंड गुणाची वनस्पती आहे. उष्णतेच्या विकारांवर शमीच्या पाल्याचा रस , जिरे आणि खडीसाखर एकत्र करून देतात.धोत-याची झाडे सर्वत्र उपलब्ध असतात. दम्याच्या विकारात कफ असेल तर धोत-याच्या पानांची धुरी देतात. सुजेवर धोत-याचा रस लावतात.मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात पुढील मंत्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी म्हणतात. 'यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च' ।। पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे.' श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात.