भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


यज्ञयाग 7

ह्या चारांत पहिला कडक तपश्चर्या करणारा तपस्वी होय. तो स्वत:ला ताप देतो, पण पराला ताप देत नाही. दुसरा खाटीक पारधी वगैरे. तो दुसर्‍या प्राण्याला ताप देतो पण स्व:ताला ताप देत नाही. तिसरा यज्ञयाग करणारा. तो स्वत:लाही ताप देतो आणि इतर प्राण्यानांही ताप देतो. चवथा तथागताचा (बुध्दाचा) श्रावक. तो आपणाला किंवा पराला ताप देत नाही.

या चोराचेंही सविस्तर विवरणं त्या सुत्तांत सापडतें. त्यापैकी, तिसर्‍या प्रकारच्या माणसाच्या वर्णणाचा सारांश येणेप्रमाणें :- भगवान् म्हणतो,'' भिक्षुहो, आत्मतप आणि परन्तप माणूस कोणता? एखादा क्षत्रिय राजा किंवा एखादा श्रीमंत ब्राह्मण एक नवीन संस्थागार बांधतो, आणि मुंडण करून खराजिन पांघरून तुपातेलाने अंग माखतो, व मृगाच्या शिंगाने पाठ खाजवित आपल्या पत्नीसह व पुरोहित ब्राह्मणासह त्या संस्थागारात प्रवेश करतो. तेथे तो शेण सारवलेल्या जमिनीवर कांही न अंथरतां निजतो. एका चांगल्या गाईच्या एका पान्ह्याच्या दुधावर तो राहतो, दुसर्‍या पान्ह्याच्या दुधावर त्याची पत्नी राहते. आणि तिसर्‍या पान्ह्याच्या दुधावर पुरोहित ब्राह्मण राहतो. चौथ्या पान्ह्याच्या दुधाने होम करतात. चारही पान्ह्यातून शिल्लक राहिलेल्या दुधावर वासराला निर्वाह करावा लागतो.

'' मग तो म्हणतो, 'ह्या माझ्या यज्ञाकरिंता इतके बैल मारा, इतके गोहरे मारा, इतक्या कालवडी मारा, इतके बकरे मारा, इतके मेंढे मारा, यूपांसाठी इतके वृक्ष तोडा, कुशासनासाठी इतके दर्भ कापा.' त्याचे दास, दूत आणि कर्मकार दंडभयाने भयभीत होऊन आसवें गाळीत रडत रडत तीं कामें करतात. याला म्हणतात, आत्मन्तप आणि परन्तप.''

लोकांना गोहिंसा नको होती

हे दास, दूत आणि कर्मकार यज्ञाचीं कामें रडत रडत कां करीत असावेत? कारण, या यज्ञांत जी जनावरें मारली जात, तीं गरीब शेतकर्‍यांकडून हिरावून घेण्यांत येत असत, आणि त्यामुळे शेतकर्‍यांना फार दु:ख होई. सुत्तनिपातांतील ब्राह्मणधम्मिक सुत्तांत अतिप्राचीन काळच्या ब्राह्मणांचे आचरण वर्णिलें आहे, त्यांत खालील गाथा सापडतात. -

यथा माता पिता भाता अञ्ञ वाऽपि च ञ्ञातका ।
गावो नो परमा मित्ता यासु जायन्ति ओसधा ॥
अन्नादा बलदा चेता वण्णदा सुखदा तथा।
एतमत्थवसं ञत्वा नास्सु गावो हनिंसु ते ॥

'आई, बाप, भाऊ आणि दुसरे सगेसोयरे, यांप्रमाणेंच गाई आमच्या मित्र आहेत. कां की, शेती त्यांच्यावर अवलंबून असते. त्या अन्न, बल, कान्ति आणि सुख देणार्‍या आहेत. हें कारण जाणून प्राचीन ब्राह्मण गाईंची हत्या करीत नव्हते.'