भगवान बुद्ध (उत्तरार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


*परिशिष्ट 23

असें भगवान बोलला. आयुष्यमान राहुलाने मुदित मनाने भगवन्ताच्या भाषणाचे अभिनंदन केले.

ह्या सात सुत्तापैंकी सुत्तनिपातांत असलेलीं, मुनिगाथा, नाळकसुत्त व सारिपुत्तसुत्त हीं तीन पद्यांत व बाकी चार गद्यांत आहेत. गद्य सुत्तांत पुनरूति फार आढळते. त्या काळच्या वाङमयाची ही पध्दति समजली पाहिजे. कां की, जैनांच्या सूत्रांत आणि कांही ठिकाणीं उपनिषदांत देखील अशी पुनरूक्ति आहे. पण ती त्रिपिटकांत एवढी आहे की, हें सर्व पूर्ववत् असावें असें वाचकाला वाटतें आणि एखादा महत्तवाचा मुद्दा त्या पुनरूक्तींत तसाच राहून जातो. त्याच्याकडे वाचकाचें लक्ष जात नाही. उदाहरणार्थ, ह्या राहुलोवादमुत्तांत कायिक, वाचसिक आणि मानसिक कर्माच्या प्रत्यवेक्षंणात तोच तोच मजकूर पुन:पुन: आला आहे. परंतु कायिक आणि वाचसिक अकुशल कर्म आचरणांत आलें, तर शास्त्यापाशीं किंवा विद्वान सब्रह्मचार्‍यांपाशीं त्याचा अविष्कार करावा, व तसें कर्म पुन: होऊं देऊ नये असे म्हटले आहे. मानसिक अकुशलाला हा नियम लागु केला नाही. कां की, विनयपिटकांत कायिक आणि वाचसिक दोषांनाच अविष्कारादिक (पापदेशना इत्यादि ) प्रायश्चितें सांगितलीं आहेत; मनोदोषासाठी प्रायश्चित्तविधान नाही. त्याला प्रायश्चित्त म्हटलें म्हणजे त्याबद्दल पश्चाताप करावा व लाज धरावी तसा अकुशल कर्मांतील आणि मानसिक अकुशल कर्मातील हा फरक राहुलोवादसुत्त वरवर वाचणार्‍याच्या लक्षात यावयाचा नाही.
अशोकाच्या वेळीं हीं सर्व सुत्तें अशीच होतीं, की संक्षिप्त होती हें सांगतां येणें कठिण आहे. ती संक्षिप्त असलीं तरी सारभूत मजकूर हाच होता यांत शंका नाही. सुत्तपिटकांतील प्राचीनतम सुत्ते ओळखण्याला हीं सात सुत्तें फार उपयोगी आहेत.