भगवान बुद्ध (पूर्वार्ध)

गौतम बुद्धांचे चरित्र


गोतम बोधिसत्त्व 9

बोधिसत्त्वाचें समाधिप्रेम

''वर निर्दिष्ट केलेल्या शुद्धोदन राजाच्या कृषिसमारंभाच्या वेळीं बालपणीं बोधिसत्त्वाला नेण्यांत आलें होतें, आणि त्याच्या दायांनी त्याला एका जंबुवृक्षाखाली बिछान्यावर निजविलें.  सिद्धार्थकुमार निजला आहे, असें पाहून दाया कृषिसमारंभ पाहावयास गेल्या.  इतक्यांत बोधिसत्त्व उठून आसनमांडी ठोकून ध्यानस्थ बसला.  बर्‍याच वेळाने दाया येऊन पाहतात, तों इतर वृक्षांची छाया उलटली होती.  पण या जंबुवृक्षाची पूर्वीप्रमाणेंच राहिली !  हा अद्‍भुत चमत्कार पाहून शुद्धोदन राजाने बोधिसत्त्वाला नमस्कार केला.''  जातकांतील दंतकथेचें हें सार आहे.  बोधिसत्त्वाच्या अयुष्यांतील या महत्त्वाच्या गोष्टीला अशा प्रकारें अद्‍भुत चमत्काराचें स्वरूप दिल्यामुळे तिच्यांत कांहीच अर्थ राहिला नाही.  खरी गोष्ट अशी दिसते की, बोधिसत्त्व बापाबरोबर शेतावर जाऊन नांगरणीचें वगैरे काम करी आणि सुटीच्या वेळी एका जम्बुवृक्षाखाली ध्यानस्थ बसत असे.

मज्झिमनिकायांतील महासच्चकसुत्तांत बुद्ध भगवान सच्चकाला उद्देशून म्हणतो --

''मला आठवतें कीं, माझ्या पित्याच्या शेतावर गेलों असतां जम्बुवृक्षाच्या शीतल छायेखाली बसून कामोपभोगांपासून आणि अकुशल विचारांपासून विमुक्त होऊन सवितर्क, सविचार आणि विवेकापासून उत्पन्न होणारें प्रीतिसुख ज्यांत आहे असें प्रथमध्यान मी संपादन करीत होतों.  हाच तर बोधाचा खरा मार्ग नसेल ना ?  त्या माझें विज्ञान स्मृतीला अनुसरलें आणि हाच तो बोधाचा मार्ग असावा असें मला वाटलें.  हे अग्गिवेस्सन, मी माझ्याशींच म्हणालों, 'जें सुख कामोपभोगांपासून आणि अकुशल विचारांपासून अलिप्‍त आहे, त्या सुखाला मी कां भितों ?'  नंतर मी विचार केला की, त्या सुखाला मी भितां कामा नये.  परंतु तें सुख अशा (देहदंडाने झालेल्या) दुर्बल शरीराने प्राप्‍त करून घेतां येणें शक्य नाही; म्हणून पुनः पुरेसें अन्न खाणें योग्य आहे.''

बोधिसत्त्वाने सात वर्षे देहदंडन चालविल्यानंतर त्याला बापाच्या शेतींतील जम्बुवृक्षाखाली बसून मिळणार्‍या प्रथमध्यानाची एकाएकी आठवण झाली, आणि तोच मार्ग तत्त्वबोधाचा असला पाहिजे असें गृहीत धरून त्याने देहदंडन सोडून दिलें, आणि आहार सेवन करण्यास आरंभ केला.

परंतु बोधिसत्त्व लहानपणींच हें ध्यान कोणाकडून शिकला ?  किंवा तें त्याला आपोआपच प्राप्‍त झालें ?  जातकट्ठकथाकाराने ललितविस्तरकाराने किंवा बुद्धचरित्रकाराने हें ध्यान अत्यंत बालपणीं बुद्धाला प्राप्‍त झालें असें वर्णिलें असल्यामुळे, तें त्याला आपोआपच मिळालें, व तो एक अद्‍भुत चमत्कार होता असें म्हणावें लागतें.  पण वर दिलेल्या भरण्डुकालामसुत्ताचा विचार केला असतां ह्या अद्‍भुत चमत्काराचा सहज उलगडा होतो.  कालामाचा आश्रम कपिलवस्तूमध्ये होता.  म्हणजे शाक्य लोकांत त्याचा संप्रदाय जाणणारे पुष्कळ होतें, असें म्हटलें पाहिजे.  पुढे जी कालामाची हकीगत येणार आहे तिजवरून दिसून येईल की, कालाम ध्यानमार्गी असून तो समाधीच्या सात पायर्‍या शिकवीत होता.  त्यांपैकी पहिली पायरी जें प्रथमध्यान तें बोधिसत्त्वाला घरीं असतांच प्राप्‍त झालें असलें तर त्यांत अद्‍भुत चमत्कार कोणता ?  कांही चमत्कार असला तर तो एवढाच की लहानपणीं शेती करतांना देखील बोधिसत्त्वाची वृत्ति धार्मिक असून तो वेळोवेळीं ध्यानसमाधीचा अभ्यास करीत होता.