बौद्धसंघाचा परिचय

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय


भाग २ रा 26

५९. बुद्ध भगवान् आळवी येथें अग्गाळव चेतियांत रहात होता. त्या काळीं (..) भिक्षु बांधकाम करीत असतां जमीन खोदवीत. त्यांच्यावर लोक(..) करूं लागले. ही गोष्ट समजली, तेव्हां भगवंतानें त्यांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

जो भिक्षु जमीन खणील किंवा खणवील, त्याला पाचित्तिय होते ।।१०।।

६०. बुद्ध भगवान्, आळवी येथें अग्गाळव चेतियांत रहात होता. त्या काळीं (,,) भिक्षु बांधकाम करीत असतां झाडें तोडीत असत व तोडवीत असत. असा एक भिक्षु एक झाड तोडीत असतां त्या वृक्षावर राहणारी वृक्ष देवता त्याला म्हणालीं, “भदंत, तुझें घर बनविण्यासाठीं माझ्या घराचा नाश करूं नकोस.” तिचें वचन न ऐकतां भिक्षूनें तें झाड तोडलें. तें खालीं पडलें त्या देवतेला व तिच्या मुलांला पुष्कळ जखमा झाल्या. तिच्या मनात त्या भिक्षूला ठार मरावें असा विचार आला; परंतु मनोनिग्रह करून भगवंताजवळ जाऊन तिनें ही सर्व गोष्ट त्याला सांगितली. तिनें त्या भिक्षूला मारलें नाहीं ह्याबद्दल भगवंतानें तिची स्तुति केली, व तेथून कांही अंतरावर एक मोकळा वृक्ष होता त्यावर निवासस्थान करण्यास तिला सांगितलें. भिक्षु झाडें तोडतात म्हणून लोकहि भिक्षूंवर टीका करूं लागले. शेवटी ह्या प्रकरणीं भगवंतानें भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

वनस्पति तोडल्यास पाचित्तिय होतें ।।११।।

६१. बुद्ध भगवान् कौशांबी येथे घोषितारामांत रहात होता. त्या काळीं छन्न भिक्षु अनाचार करून संघांत चौकशी होत असतां भलतें सलतें बोलत असे; म्हणे कीं, आपत्ति कोणाला झाली? कोणत्या बाबतींत झाली? कशी झाली? कोणाला बोलतां? काय बोलतां? सज्जन भिक्षूंना ही गोष्ट आवडली नाहीं; भगवंताला ती समजली, तेव्हां त्यानें छन्न भिक्षूचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

“भलतें बोलेल त्याला पाचित्तिय होतें.”

त्या काळीं छन्न भिक्षु भलतेंच बोलल्यास आपत्ति होते म्हणून संघांत मुकाट्यानें रहात असे व त्यामुळें संघाला त्रास होत असे. ही गोष्ट भगवंताला समजली तेव्हां त्यानें वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

भलतें बोलेल किंवा (मौन धरून) संघास त्रास देईल, त्याला पाचित्तिय होतें ।।१२।।

६२. बुद्ध भगवान राजगृह येथें वेणुवनांत रहात होता. त्या काळीं दब्ब (..)पुत्त संघाच्या निजण्याची व जेवणाची व्यवस्था पहात असे. मित्तिय आणि भुमजक हे दोघे भिक्षु त्याची अवज्ञा करूं लागले. तेव्हां भगवंतानें भिक्षूंसाठीं नियम केला तो असा:-

“अवज्ञा केली असतां पाचित्तिय होतें.”

अवज्ञा केली असतां पाचित्तिय होतें म्हणून मित्तिय आणि भुम्मजक दब्बा निंदा करूं लागले. तेव्हां भगवंतानें वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

अवज्ञा किंवा निंदा केली असतां पाचित्तिय होतें ।।१३।।