देवांच्या भूपाळ्या

सगुण उपासनेंत देवाला मनुष्यासारखे सोपस्कार करतात. देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. त्याचप्रमाणें स्वतःच्या अंतःकरणांत असलेल्या देवत्त्वालाही जागृत करण्याचा हेतु भूपाळ्या म्हणण्यांत डोळ्यासमोर ठेवलेला आहे.


भूपाळी आत्मारामाची

उठा प्रातःकाळ झाला । आत्माराम पाहूं चला ।

हा समयो जरिं टळला । तरि अंतरला श्रीराम ॥ध्रु०॥

जीव-शिव दोघेजण । भरत आणि शत्रुघन ।

आला बंधु लक्षुमण । मन उन्मन होऊनी ॥१॥

विवेक वसिष्ठ सद‌गुरु । संतसज्जन मुनीश्वरु ।

करिती नामाचा गजरु । हर्षनिर्भर होउनियां ॥२॥

सात्त्विक सुमंत प्रधान । नगरवासी अवघे जन ।

आला वायूला नंदन । श्रीचरण पाहावया ॥३॥